पवनपुत्र हनुमान
– सारंग कुलकर्णी
काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.
जन्माचा इतिहास
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमानजयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकीरामायणा मध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे :
अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्कं फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
उत्सव साजरा करण्याची पद्धत-
या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?
‘हनुमान जयंती’ या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी ‘श्री हनुमते नम:।’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतितत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.
जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुती हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तिमान आहे.
कठोर आराधनेमुळे अंजनीच्या पोटी शंकराचा जन्म
मुनीच्या आदेशानुसार अंजनी वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनीला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजनी आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनीच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनीला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.
ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !
हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण
सगळया देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.
